पीएम किसान योजनेंतर्गत गावपातळीवरील विशेष मोहिम
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या ई-केवायशी न केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायशी करण्यासाठी दि.१२ ते २१ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम गावस्तरावर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात यापुर्वी राबविलेल्या मोहिमेत १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि, राज्यातील एकुण १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत (सीएससी) ईकेवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी दि.१२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आणखी १० दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमेदरम्यान केवळ ईकेवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ईकेवायसी प्रमाणिकरण पुर्ण करावे, शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन अँप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.
पीएम किसान योजनेंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पुर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोईनुसार प्राधान्याने नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत होणार आहे. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. या दोनही योजनांच्या लाभासाठी २१ फेब्रुवारी पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे कृषि विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
000
Comments
Post a Comment