अमृत कलश जिल्हाधिकारी यांच्या स्वाधिन ; यवतमाळ नपने तयार केलेला कलश दिल्लीला जाणार !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ आभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यवतमाळ नगरपरिषदेने तयार केलेला अमृत कलश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सुपूर्द करण्यात आला.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्यासमवेत अधिकारी, कर्मचारी तथा नगरपरिषदेचे शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांनी या कलशाची शोभायात्रा काढली.
यासंदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधतांना मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त न.प.प्रशासनाच्यावतीने राबविलेल्या विविध उपक्रमानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविले होते. त्यानुसार यवतमाळची पावनभुमी असलेल्या व स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणाऱ्या आझाद मैदान येथील मुठभर मातींसह शहरातल्या २८ प्रभागातील माती आणि तांदूळ गोळा करून तयार केलेला हा अमृत कलश आज ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांना स्वाधिन करण्यात आला.
मुख्याधिकारी पुढे म्हणाले की, पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून 'मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या देशभरातील वीर शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्ली येथे तयार होणाऱ्या अमृत वाटीकेकरीता देशभरातील माती एकत्रित करण्यात आली असून यवतमाळची ही माती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडलेल्या विशेष दुतासोबत हा अमृत कलश दिल्लीला पाठवला जाईल असेही त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment