जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी अनुदान मिळणार
शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या घटकाचा लाभघेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. या अभियानाअंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. योग्य मशागत पध्दतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधीचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी कारणांमुळे उत्पादकता कमी होत आहे.नवीन लागवडी प्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणेही जिल्ह्याची फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची बाबआहे. सन 2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे. या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिकू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्पखर्च रक्कम 40 हजार रूपये प्रति हेक्टर ग्राह्य धरुन त्याच्या 50 टक्केप्रमाणे जास्तीत जास्त रक्कम 20 हजार रूपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय राहील. त्यानुसार आंबा फळपिकाचे कमीत कमी वय 20 वर्ष तर जास्तीत जास्त वय 50 वर्ष, चिकू कमीत कमी वय 25 वर्ष तर जास्तीत जास्त वय 50 वर्ष, संत्रा कमीत कमी वय 10 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष आणि मोसंबी फळपिकाचे कमीत कमी वय 8 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष राहील. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्राव मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment