मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी शेतकऱ्यांना झटका मशीन देणार - पालकमंत्री संजय राठोड
पहिल्या टप्प्यात १६ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार : शेतकरी हितासाठी जिल्हा खनिज निधीचा वापर ; पालकमंत्र्यांची संकल्पना
: सध्या अनेक भागात मानव आणि वन्यप्राण्यांमध्ये संघर्षाच्या घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या झटका मशीन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी दिली.
दिग्रसमधील भवानी टेकडी परिसरात अटल आनंदवन घनवन या मियावाकी प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
शेतकऱ्यांना झटका मशीन देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्हा खनिकर्म योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून ५० कोटींची तरतूद केली आहे. प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक हजार प्रमाणे १६ हजार लाभार्थींची निवड करुन त्यांना झटका मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त अर्जदारांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड करुन त्यांना मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या झटका मशीनच्या माध्यमातून मानव- वन्यप्राण्यांतील संघर्ष कमी करण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारची पद्धत चंद्रपूरमध्ये वापरली जात आहे. त्याच धर्तीवर डॅा. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेंच्या सहाय्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झटका मशीन देण्यात येणार आहे. वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य केले पाहिजे. वन विभागाच्या उपक्रमांसाठी राज्य शासन सहकार्य करेल, असे पालकमंत्री श्री. राठोड यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment