क्षयरोग निर्मुलनाकरीता दानशुरांनी सहकार्य करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.18 ऑगस्ट :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील क्षयरुग्णांना मदत उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगसमुह, स्वयंसेवी संस्था व दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. भारत सरकारने सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने शासन क्षयरुग्णांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देवून त्यांना औषधोपचार मिळवून देत आहे. उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना शासनामार्फत प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजने अंतर्गत 500 रुपयांची मदत थेट बॅक खात्यामध्ये दिली जात आहे. परंतु या व्यतीरिक्त क्षयरुग्णांना अतिरिक्त मदत देण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, डायग्नोस्टीक मदत, व्होकेशनल मदत या स्वरुपातील मदत उद्योगसमुह, सामाजिक संस्था व दानशुर यांनी करावी असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. ही मदत उपचार सुरु असणाऱ्या क्षयरुग्णांना किमान एक वर्षासाठी प्राधान्याने अतिरिक्त पोषण आहार तसेच डायग्नोस्टिक मदत व्होकेशनल मदत व इतर आवश्यक मदत स्वरुपात उद्योग समुह, स्वयंसेवी संस्था व दानशून व्यक्ती इत्यादींच्या माध्यमातुन उपलब्ध करुन द्यावयाची आहे. केंद्र शासनाच्या या महत्वकांशी उपक्रमास सहकार्य करण्यास इच्छुक असलेले उद्योग समुह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अथवा dtomhytl@rntcp.org या ई-मेल आयडीद्वारे निक्षय मित्र म्हणून संपर्क साधावा आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन एकजुटीने हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी