जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन
जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीकरीता जिल्हास्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली शालेयस्तरावर निबंध, चित्रकला स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. 1 ते 8 जानेवारी दरम्यान स्पर्धा शाळास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी शाळा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती चित्राचे व निबंधाचे मुल्यमापन करुन स्पर्धकाची निवड करण्यात येणार आहे. दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय, तृतीय शाळास्तरावर निवड केलेल्या स्पर्धकांची चित्रे, निबंध व नावे संबंधित पंचायतीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
शाळास्तरावरुन प्राप्त झालेल्या चित्राचे व निबंधाचे तालुकास्तरीय समिती मार्फत मुल्यमापन करण्यात येणार आहे. दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तालुकास्तरावरील समिती सदस्य करणार आहे. पंचायत समिती स्तरावर निवड झालेल्या 6 स्पर्धाकांची नावे व चित्र, निबंध गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर पाठवणार आहे. पंचायत समिती स्तरावरील विजयी झालेल्या, दोन्ही गटातील स्पर्धकांची अंतिम निवड जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या समितीकडून करण्यात येईल. निबंध स्पर्धेसाठी 40 मिनिटाचा वेळ व शब्द मर्यादा 1500 देण्यात आली आहे.
निबंध लेखनाचे विषय : पाऊस पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जिवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलजिवन मिशन व माझ्या गावाचा विकास, जलसंर्वधन काळाची गरज या विषयावर निबंध लेखन करायचे आहे.
चित्रकला स्पर्धेचे विषय : पाऊस पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलसंवर्धन व पाण्याचे महत्व, पाण्याचे वितरण व करप्रणाली, पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग, पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती या विषयावरील प्राप्त निबंध व चित्रांची निवड करण्यात येईल.
बक्षिसाची रक्कम : प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये, व्दितीय 11 हजार रुपये, तृतीय 5 हजार 500 रुपये तर माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये, व्दितीय 11 हजार रुपये, तृतीय 5 हजार 500 रुपये विजेत्या स्पर्धकास जिल्हास्तरावर सन्मानित करुन बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. पंचायत समिती स्तरावर स्पर्धाचे नियोजन पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील गट समन्वयक, समूह-समन्वयक व जल जीवन मिशनचे आयएसए कर्मचारी करणार आहे.
000
Comments
Post a Comment