'त्या' अपघातील तीन जखमी बरे झाल्यानंतर मध्यप्रदेशला रवाना
v प्रशासनामार्फत खाजगी वाहन आणि जेवणाच्या साहित्याची व्यवस्था
यवतमाळ, दि. 30 : स्थलांतरीत
मजुरांना घेऊन जाणा-या बस अपघातात जखमी झालेले मध्यप्रदेशातील तीन रुग्ण पूर्णपणे
बरे झाल्यामुळे त्यांना शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात
आली. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सदर नागरिकांना मध्यप्रदेशला रवाना करण्यासाठी
खाजगी वाहन तसेच प्रवासादरम्यान भोजन, पाणी, फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्याच्या
सुचना तहसीलदार कुणाल झाल्टे यांना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदारांनी सर्व
व्यवस्था करून तीनही नागरिकांना वैद्यकीय महाविद्यालयातून मध्यप्रदेशसाठी रवाना
केले.
सुट्टी देण्यात आलेल्या
नागरिकांमध्ये सोनूलाल दादू आणि रामराज बैगा हे दोघेही मधप्रदेशातील सिधी या
जिल्ह्यातील बहरी तालुक्यात अमरही गावचे रहिवासी आहेत. तर सुनिल सिंह हे रिवा
जिल्ह्यातील तेवथर तालुक्यात चौखडा या गावाचे रहिवासी आहेत. 25 मे रोजी झारखंड
येथील पलामू जिल्ह्यातील 16 मजुरांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे त्यांच्या
गृहराज्यात रवाना करण्यात आले होते.
दि. 19 मे रोजी सोलापूरवरून नागपूरला
स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणा-या बसचा आर्णी तालुक्यातील कोळवण येथे टिप्परला धडक
दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले होते.
जखमींमध्ये झारखंडचे 19 मजूर, छत्तीसगडचे आठ मजूर आणि मध्यप्रदेशचे तीन असे एकूण
30 जण आणि दोन चालक होते. अपघात होताच सर्व जखमींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
भरती करण्यात आले होते. तसेच अपघाताचे वृत्त कळताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय
राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी रुग्णालयात भेट देऊन भरती रुग्णांची
आस्थेने विचारपूस केली होती. जिल्हा प्रशासन अपघातातील जखमींची पूर्ण काळजी घेईल.
कोणतीही कमतरता जाणवू देणार नाही. आवश्यक सर्व बाबी प्रशासनाकडून करण्यात येतील.
तसेच बरे झाल्यानंतर आपापल्या राज्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष व्यवस्था
करेल, असा विश्वास पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांनी त्यांना दिला होता.
Comments
Post a Comment