पावसामुळे होणारी हाणी टाळणेकरिता जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना
यवतमाळ, दि 13 जुलै जिमाका :- जिल्ह्यात 11 जुलै पासून सतत पाऊस सुरू असून या सततच्या पावसामुळे होणारी जिवीत व वित्त हाणी टाळणेकरिता जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याअनुषंगाने दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
मार्गदर्शक सूचनांनुसार पुर येण्याची पुर्वसुचना मिळाल्यास रेडीओ, टि.व्ही. व स्थानिक प्रशासनाकडुन मिळणाऱ्या सुचनांचे पालन करावे. अफवावर विश्वास ठेवु नये वा अफवा पसरवु नये. सततच्या पावसामुळे व पुरपरिस्थितीत मातीची घरे लवकर पडतात अशा घरात राहणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. पूर परिस्थिती दरम्यान लहान मुलांना पाण्याजवळ जावु देवु नये. नदी/ नाल्यास पुर आल्यांस पाण्याची पातळी कमी होई पर्यंत नदी/ नाला ओलाडंण्याचे धाडस करु नये व अशा रस्ता व पुलांवरून गाडी नेवू नये, अशामुळे जिवीत हाणी होण्याची शक्यंता नाकारता येत नाही. पुरपरिस्थितीत पिण्याचे पाणी, बिस्कीट, गुळ, शेंगदाणे यासारखे सुके खाद्य पदार्थ यांचा योग्य साठा घरामध्ये असावा. विजेच्या उपकरणांचा वापर करु नये, विजेचा पुरवठा बंद करावा. नदी नाले, ओढे, डबके इत्यादी ठिकाणी मासेमारी करिता जावू नये. पुरपरिस्थितीत साथीचे रोग पसरण्यारची शक्यता असते अशा परिस्थितीत साथीच्या रोगापासुन संरक्षणासाठी उकळलेले पाणी प्यावे, अन्न पदार्थ झाकुन ठेवावे. साथीच्या रोगापासुन संरक्षणासाठी प्राप्त झालेल्या औषधांचा योग्य वापर करावा. स्थालांतर करावे लागल्यास आवश्यक वस्तु सोबत घ्यावे व सुरक्षित रस्त्याचा वापर करावा. घरातील उपयुक्त सामान उंच सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्तीच्या प्रसंगी जवळील तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन अथवा अग्निशामक दलाशी संपर्क साधावा.
गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल व इतर सर्व शासकीय कर्मचारी यांनी ग्रामस्थांना पुर परिस्थिती तसेच अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्ती दरम्यान घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात, जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. शासकीय व प्रशासकीय प्रतिनिधी यांनी एकमेकांशी समन्वय ठेवणे, वरिष्ठ कार्यालयाच्या संपर्कात राहणे, मुख्यालयी राहणे, पूर्णवेळ दूरध्वणी सुरू ठेवणे, तसेच कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठ प्रशासनास माहिती देवून आपत्ती निवारणाची कार्यवाही दिलेल्या सूचनांनुसार करावी, असे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment