‘स्वराज्य महोत्सव’: उत्साहात करा साजरा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन

Ø 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन Ø ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी मदतीचे आवाहन Ø अंदाजे 4 लाख 62 हजार ध्वजाची आवश्यकता यवतमाळ, दि 21 जुलै जिमाका :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व ‘स्वराज्य महोत्सव’ उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. भारतीय स्वतंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी त्यांचे स्मरण व्हावे म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव निमित्त जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा घेवून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण करणे, अनामवीर स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांच्या कार्याची माहिती गावात देणे, स्वातंत्र्यकालीन माहिती, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती संकलित करणे याशिवाय स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी तसेच शालेय महाविद्यालय स्तरावर निबंध वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्यात येईल. याच महोत्सवाचा एक भाग म्हणून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येईल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाच्या वारसा स्थळांच्या स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात येईल. जिल्ह्याच्या मुख्यालयात उंच राष्ट्रध्वज उभारणे, संविधान स्तंभाची उभारणी, शासनमान्य लामन दिवा लावणे आदी उपक्रम राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येतील त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा शासकीय कार्यालयामध्ये वृक्षारोपण मिळून विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होतील, यासंदर्भात नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सर्व कार्यालय प्रमुखांना निर्देशीत करण्यात आले आहे. *"हर घर तिरंगा" उपक्रमासाठी मदतीचे आवाहन* “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर तिरंगा " हा उपक्रम संपुर्ण यवतमाळ जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. सदर उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घर, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, अंगणवाडी, पतसंस्था, सहाकारी संस्था, दवाखाने, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वज फडकविण्यात येणार आहे. "हर घर तिरंगा " उपक्रम जिल्ह्यात साजरा करणेसाठी नागरिकांना अंदाजे 4 लाख 62 हजार ध्वजाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सन्माननीय खासदार, आमदार, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे नेते, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगर परिषद, नगर पालीकाचे आजी- माजी पदाधिकारी, सामाजिक संस्था, लोक उपयोगी काम करणारे दानशूर व्यक्ती, उद्योजक, व्यापारी व व्यावसायिक यांनी वरिलप्रमाणे प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण करणेसाठी निधी अथवा ध्वज दान स्वरुपात नागरिकांना मदत करावी. तसेच, ज्या नागरिकांना व संस्थांना निधी अथवा ध्वज दान करण्याची इच्छा आहे, त्यांनी मोबाईल क्रमांक 8483825560, 9422169672, 7588188896 किंवा 7057055690 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संयुक्तरित्या केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी