उमरखेड तालुक्यातील बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश
यवतमाळ, दि 7 जुलै (जिमाका) :- उमरखेड तालुक्यातील चूरमुरा (तांडा) या गावी अल्पवीन बालिकेचा बालविवाह 4 जुलै रोजी थांबविण्यात प्रशासनाला यश आले असून नागरिकांनी बालविवाहाबाबतची माहिती चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर देण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाने केले आहे.
बालविवाहाबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षास गोपणीय माहिती प्राप्त होताच कार्यालयाचे माहिती विश्लेषक सुनिल बोक्से यांनी तातडीने चूरमुरा(तांडा) या गावी भेट देवून पोलीस प्रशासन, महसूल, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गाव बाल संरक्षण समितीचे पदाधिकारी यांचे मदतीने बालविवाह थांबविण्यात आला. याप्रसंगी अल्पवयीन बालिकेच्या कुटुंबास बालीकेचा विवाह न करणेबाबत व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देवून समज देण्यात आली, तसेच बाल विवाह प्रतीबंधक अधिनियमानुसार होणाऱ्या कायदेशीर शिक्षेची माहिती देखील देण्यात आली. बालिकेच्या आई वडिलांकडून बालिकेचा विवाह 18 वर्ष पूर्ण झालेनंतरच करण्यात यावा असा जवाब लिहून घेण्यात आला व त्याप्रमाणे सुचना पत्र सुद्धा देण्यात आले.
सदर बालविवाह थांबविण्यास तहसीलदार आनंद देऊळगावकर, उमरखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमोल माळवी, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, बीट जमादार रोषण सरनाईक, रावसाहेब मस्के, तलाठी भीमराव मनवर, परीविक्षिका ज्योती करे, अंगणवाडी सेविका उज्वला सावते, पोलीस पाटील नारायण पवार, इत्यादी च्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.
Comments
Post a Comment