विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे- डॉ.पंकज आशिया

पिकविमा योजना तक्रार निवारण समितीचा आढावा : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा तक्रार निवारण समीतीची सभा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या योजनेंतर्गत प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यात ३ लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी ८ लाख ४५ हजार पिक विमा अर्ज दाखल केले आहे. या योजनेंतर्गत पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट इत्यादी कारणाने होणाऱ्या पिक नुकसानीच्या पुर्व सुचना ह्या ७२ तासाच्या आत विमा काढलेल्या शेतकऱ्याने दाखल करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात 94 हजार नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण पुर्ण : जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांकडून १ लाख ३४ हजार पुर्व सुचना प्राप्त झाल्या आहे, त्यापैकी ९४ हजार ५७१ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरित पंचनामे पुढील पाच दिवसात पूर्ण करण्याच्या सुचना रिलायन्स जनरल विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिल्या.
नुकसान सर्वेक्षणासाठी पैसे मागितल्यास तक्रार नोंदवा : पिक विमा कंपनीच्या प्रतिनीधींकडून नुकसानीच्या सर्वेक्षणसाठी पीक नुकसान पर्यवेक्षकाकडून शेतकऱ्यांची अडवणूक करुन पैशाची मागणी होत असल्याबाबत तक्रारी आहे. त्यानुषंगाने नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या नुकसान पर्यवेक्षकाला कुठलाही आर्थिक व्यवहार करु नये. तसेच कोणत्याही प्रलोभणास बळी पडू नये. नुकसान पर्यवेक्षकाडून अडवणूक झाल्यास किंवा पैशाची मागणी झाल्यास विमा कंपनीच्या १८००-१०२-४०८८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी खरीप हंगामातील पिक विमा योजनेतील प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला. भारतीय कृषि विमा कंपणीकडून १०० टक्के नुकसान होऊन देखील बऱ्याच शेतकऱ्यांना ३३ टक्के प्रमाणे नुकसान दाखवून विमा भरपाई रक्कम दिली गेल्याची बाब वारंवार कंपणीला कळवून देखील कंपनीने कारवाई केली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांचे बॅकेचे अकाऊंट नंबर किंवा आयएफएससी क्रमांक चुकला आहे, अशा ४ हजार २८८ शेतकऱ्यांची विमा रक्कम तातडीने अदा करण्याबाबत भारतीय कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला बैठकीत सूचना देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी