आदिवासी योजनांच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन
आदिवासी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. परंतु लाभ मंजूर होऊनही कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची 8 ऑक्टोबरपर्यंत पूर्तता करावी, असे आवाहन पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
आदिवासी विकास विभागाच्यावतीने न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात शेळीगट, बियाण्यासाठी अर्थसहाय्य, तुषार सिंचन, ताडपत्री तसेच आदिवासी मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलसाठी अर्थसहाय्य अशा विविध स्वरूपाच्या योजनांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ रोख रकमेच्या स्वरूपात डीबीटीद्वारे देण्यात येतो.
योजनेचा लाभ प्रथम हप्ता 75 टक्के व साहित्याची खरेदी केल्यानंतर 25 टक्के देण्यात येते. तसेच आदिवासी लाभार्थी प्रथम हप्त्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेचे विवरण आवश्यक आहे. यासाठी बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स लाभार्थी आणून देत नाहीत. काही लाभार्थी पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी साहित्य खरेदी केल्याची बिले, पावती आणून देत नाहीत. अशा कारणांमुळे लाभार्थ्यांना देय लाभाची रक्कम वेळेवर खर्च होत नाही.
या योजनेंतर्गत सन 2016-17 पासून डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. परंतु, लाभार्थ्यांकडून कागदपत्रांच्या प्रति मिळत नसल्याने योजनेचा निधी वर्षानुवर्ष अखर्चित राहतो. त्यामुळे पांढरकवडा प्रकल्पांतर्गत येत असलेल्या केळापूर, घाटंजी, मारेगांव, झरी जामणी, राळेगांव, यवतमाळ, वणी व बाभूळगांव या तालुक्यातील लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वारंवार कळविण्यात आले असून यापूर्वी मे महिन्यातील मेळाव्यामध्ये सूचना देण्यात आल्या आहे. आता कागदपत्राच्या पूर्ततेसाठी 8 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. या मुदतीनंतर मंजूर लाभार्थ्यांचा लाभ रद्द करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
Comments
Post a Comment