आयसोलेशन वॉर्डात 182 जण भरती


v 9 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त
v गृह विलगीकरणात 91 तर संस्थात्मक विलगीकरणात 93 जण
       यवतमाळ, दि. 12 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 182 जण भरती आहेत. यापैकी 9 जणांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. गत 24 तासांत 24 जण आयसोलेशन वॉर्डात दाखल झाले आहेत. तर रविवारी एकूण 33 जणांचे नमुने नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे.
            आयसोलेशन वॉर्डातील पॉझेटिव्ह असलेले आठ रुग्ण ज्या ज्या भागात फिरले होते, तेथे आरोग्य विभागाच्यावतीने रोज सर्वे करण्यात येत आहे. यात सावर (ता. बाभुळगाव) 790 कुटुंबातील एकूण 3510 लोकांचा सर्वे करण्याकरीता 16 टीम कार्यरत आहेत. बाभुळगाव येथे 1423 कुटुंबातील 6402 लोकांचा सर्वे आरोग्य विभागाच्या 30 टिममार्फत करण्यात येत आहे. तर नेर येथे 1950 कुटुंबातील 9088 नागरिकांच्या सर्वेकरीता 22 टीम तैनात आहेत. तसेच शहरातील जाफर नगर, मेमन सोसायटी आणि इंदिरा नगर येथेसुध्दा नियमित सर्वे करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने नागरिकांना ताप, खोकला, सारीचे लक्षणे व इतर काही लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार करण्यात येतो. विशेष म्हणजे रँडम पध्दतीने या भागातील नागरिकांचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथे रोज पाठविण्यात येत आहे.
            प्रतिबंधित क्षेत्रातील ज्या नागरिकांचे नमुने चाचणीकरीता घ्यावयाचे आहे, त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारावा. एकापेक्षा जास्त लक्षणे असलेल्या व्यक्तिला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयसोलेशन वॉर्डात त्वरीत दाखल करा. यात कोणताही निष्काळजीपणा करू नका, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी आरोग्य विभागाला दिले आहे.
            जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या 91 असून 93 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. यात धामणगाव रोडवरील अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहात 23 तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात 70 जण आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी सकाळी भरती झालेल्या 80 वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. 12 दिवसांपासून त्यांना खोकला व दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. तसेच त्यांना सारीचे पण लक्षण होते. यादरम्यान त्यांनी कुठेही प्रवास केला नसला तरी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर  त्यांचे नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यावर  पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 
०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल