संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांवर दंड वसूल



v 517 प्रकरणामध्ये कारवाई
v मास्क न वापरणाऱ्यांची प्रकरणे सर्वाधिक
       यवतमाळ, दि. 18 : संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून दोन लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण 517 प्रकरणात ही कारवाई केली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांची प्रकरणे सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सामाजिक अंतर ठेवणे, किराणा दुकानात दर्शनी भागात दरपत्रक लावणे यासारख्या विविध सूचनांचा समावेश आहे. तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 517 प्रकरणात एकूण 2 लाख 11 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावल्याबद्दल जिल्ह्यातील 447 प्रकरणात प्रती व्यक्ती 200 रुपये प्रमाणे एकूण 89 हजार 400 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल यवतमाळ, पुसद, बाभुळगाव, राळेगाव व नेर तालुक्यातील एकूण 12 प्रकरणात प्रती व्यक्ती 500 रुपये प्रमाणे सहा हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच दुकानांसमोर सामाजिक अंतर न ठेवल्याबद्दल 39 प्रकरणात प्रती व्यक्ती 2 हजार रुपये दंड प्रमाणे एकूण 78 हजार रुपये तर किराणा दुकानात दरपत्रक न लावल्याबद्दल प्रती व्यक्ती 2 हजार रुपये प्रमाणे 19 प्रकरणात 38हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
000000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल