१ ते १५ जुलै  विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या आणि शहरी भागातिल झोपडपट्ट्या भागात लक्ष केंद्रित करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि 20 जून, (जिमाका) :- भारतामध्ये 0 ते 5 वर्ष या वयोगटात होणाऱ्या एकूण बालमृत्यूमध्ये अतिसार व निमोनियामुळे होणारे कुपोषण कारणीभूत आहे. आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्य टक्केवर आणण्यासाठी धडक अतिसार नियंत्रण पंधरवडा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेत आदिवासी भागातील तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या तसेच शहरी भागातिल झोपडपट्ट्या आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत ही मोहीम पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.   धडक अतिसार नियंत्रण पंधरवडा यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी सजिवकुमार पांचाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया उपस्थित होते.   ओ. आर. एस. चे द्रावण कसे बनवावे याची माहिती आणि प्रात्यक्षिक प्रत्येक घरापर्यंत पोचवावे. त्याचबरोबर शरीर पाणीयुक्त कसे ठेवावे, अतिसारमुळे होणारे दुष्परिणाम, अतिसार कशामुळे होतो आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सुद्धा पोहोचवावी. स्तनपान करताना घ्यावयाची काळजी आणि एकंदरच स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. ग्रामीण भागात सद्यस्थितीतील पावसाळ्यामध्ये  पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. त्यामुळे पाण्याचे स्त्रोतांची स्वच्छता आणि पाण्याची नियमित तपासणी करण्यात यावी. सतत पाच वर्षे ग्रीनकार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीला सन्मानित करावे आणि त्यांना सिल्वर कार्ड देण्यात यावे. तसेच रेड झोनमध्ये असलेल्या ग्रामपंचायतींना पाण्याचे स्त्रोत शुद्ध करण्यासाठी आणि त्याची निगा राखण्यासाठी प्रोत्साहित करून जनजागृती करावी .   जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत 01 जुलै ते 15 जुलै दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यामध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना झिंक गोळ्या आणि ओ.आर एस. देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या वयोगटातील २ लाख ३२ हजार ७०६ लाभार्थी असून यासाठी २३६३ आशा व आरोग्य कर्मचारी गृहभेटी देऊन अशा कुटुंबांना झिंक गोळ्या आणि ओ.आर एस चे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३२२१ कॉर्नर तसेच अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ,आयु दवाखाना, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी २४ तास कार्यरत राहणार आहे. या मोहिमेंतर्गत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, गावातील गरोदर माता, व स्तनदा माता यांना प्रात्यक्षिक व समुपदेशन करणार असून पूरक आहार याविषयीचे महत्व पटवून देणार आहेत. तसेच सर्व शाळा अंगणवाडी केंद्रामध्ये हात धुवा मोहिम आणि हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व व पद्धती याबद्दल जनजागृती करणार आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी