अंमली पदार्थाचे सेवन हा देशद्रोहच ! प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांचे युवकांना प्रबोधन
यवतमाळ दि. 24, अंमली पदार्थाचे सेवन हे शरीराला हानीकारक तर आहेच यासोबतच त्याच्या सेवनामुळे अंमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या शत्रु राष्ट्रांना यातून नफाखोरी मिळवून देण्याचे काम होत असल्याने अंमली पदार्थाचे सेवन हा देशद्रोह देखील असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले आहे.
26 जून या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस प्रशासन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आज कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, जिल्हा न्यायाधीश ए.ए.लऊळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए.नहार, वकील संघाचे ॲड. संदिप गुजरकर, प्राचार्य पी.एम.खोडके प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी पुढे बोलतांना सांगितले की युवकांनी आपले मित्र मैत्रिण यांना अंमली पदार्थ घेण्यापासून परावृत्त करावे व जीवनात कितीही अडचणी किंवा नैराश्य आले तरी अंमली पदार्थांच्या आहारी न जाता आपले राष्ट्र घडविण्याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी राष्ट्राच्या पुढील निर्मितीत आजच्या विद्यार्थ्यांचा महत्वपुर्ण सहभाग राहणार असल्याचे सांगून या तरूण पिढीणे राष्ट्राप्रती आपली जबाबदारी ओळखून अंमली पदार्थाच्या आहारी न जाण्याचा संकल्प करण्याचे सांगितले. व्यसन करायचेच असल्यास आपल्या गौरवशाली इतिहासाचे व विद्याभ्यासाचे व्यसन करून जीवनात चांगले ध्येय ठेवण्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भूजबळ यांनी व्यसनाधीनतेची कारणे आणि त्यावर उपाययोजनांची माहिती दिली.
याप्रसंगी संदिप गुजरकर यांनी अंमली पदार्थ व बेकायदेशीर तस्करी यावर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए.नहार यांनी केले तर संचालन एम.वाय. खळतकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य पी.एम.खोडके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment