कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांचा कौतुक सोहळा
प्रामाणिक माणुस बना : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
यवतमाळ, दि. 27 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बाल
न्याय मंडळ आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई संचालित रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल
जस्टीस यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे कायदेविषयक जनजागृती शिबिर आणि बालकांच्या
कौतुक सोहळा जिल्हा व सत्र न्यायालयातील सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी खुप मोठा
माणूस बनण्यापेक्षा प्रामाणिक माणूस बना, असा सल्ला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
यांनी दिला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यसाधीश डी. आर. शिरासाव अध्यक्षस्थानी
होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधीक्षक अखिलेश
कुमार सिंग, जिल्हा न्यायाधीश पी. एस. खुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना
इंगोले उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी मुलगा-मुलगी एकसमान
असून त्यांना सारखी वागणूक दिली पाहिजे. व्यवस्थेत काम करीत असताना आपल्यासमोर बालकांचा
विषय आल्यास स्वत:च्या मुलासारखे त्यांना वागणूक द्यायला हवी. मुलांना मार्गदर्शन करताना
चुकीचे काम करून खुप मोठा व्यक्ती झाले नाही तरी चालेल, मात्र प्रामाणिक व्यक्ती बना.
आपल्या आई-वडिलांची मान खाली झुकेल असे कोणतेही वाईट कृत्य करू नका. असे काही तरी कार्य
करा ज्यामुळे त्यांना तुमचा गर्व वाटेल.
श्री. शिरासाव यांनी मोठ्या व्यक्तीद्वारे लहान मुलांचा वापर
गुनहेगारी कृत्यात होतो. असे होत असल्यास बालन्याय अधिनियम 2015 नुसार मोठ्या व्यक्तीवर
कारवाई होणे गरजेचे आहे. वाईट कृत्यात मुलांचा वापर केला जावू नये, यावर आपण लक्ष ठेवणे
गरजेचे असल्याचे सांगितले.
पोलिस अधीक्षक श्री. सिंह यांनी बालकांसोबत काम करीत असताना
प्रत्येकानी संवेदशील असावे, कोणताही व्यक्ती गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, त्याचा
सभोवतालचे वातावरण आणि होणारे संस्कार त्याला चांगले किंवा वाईट बनविण्यात महत्त्वाची
भूमिका पार पडतात.
बालस्नेही बाल न्याय व्यवस्था ज्योती खांडपासोळे यांनी प्रास्ताविक
केले. अर्चना इंगोले यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, बाल न्याय मंडळाची माहिती दिली. प्रमुख
न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. के. पाटील यांनी बालकासाठी असणारे कायदे आणि त्याचे महत्त्व
तसेच श्री. खुणे यांनी बालकाचा जडणघडणीत पालकांची भुमिका, तसेच बालकल्याण समितीच्या
अध्यक्ष डॉ. छाया महाले यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात 18 वर्षाखालील विधीसंघर्षग्रस्त मुले, ज्यांच्या
हातून चुक घडली आणि गुन्हे दाखल झाल्या होत्या, अशा मुलांनी दहावी, बारावी आणि व्यावसायिक
प्रशिक्षणामध्ये यश संपादन केले, तसेच बालगृहातील 28 मुलांचे भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र
देवून कौतुक करण्यात आले.
प्रशांत पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष जिरे यांनी
आभार मानले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन आगरकर, विनोद पाटील, आरसीजेजेचे
प्रकल्प अधिकारी देवेंद्र राजूरकर, प्रशांत विघ्ने, अॅड. सुनील घोडेस्वार , अॅड. संजूताई
गभणे, श्री. बेतवार, अधीक्षक श्री. बुटले, श्री. वाटकर, श्री. स्थूल यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
0000000
Comments
Post a Comment