व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
*अर्ज करण्यासाठी 22 ऑगस्ट अंतिम मुदत
यवतमाळ, दि. 18 : राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले
आहे. हे प्रस्ताव दिनांक 22 ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात स्विकारण्यात
येतील.
पुरस्कारासाठी लेखक, कवी, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते,
किर्तनकार, प्रवचनकार, पारंपारिक लोककलावंत उदा. शाहीर, गोंधळी, भारुडकार, पोतराज,
वासुदेव व लोकनाट्यकार, शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचारी अर्ज करू शकतील. तसेच व्यसनमुक्ती
कार्य करणाऱ्या संस्थांच्या पुरस्कारासाठी सामाजिक संस्था, युवा मंडळे, महिला मंडळे,
भजनी मंडळे, बचतगट, क्रीडा मंडळे, इलेक्ट्रॉनिक मिडिया, शाळा महाविद्यालये, वृत्तपत्रे,
व्हिडीओ पार्लर, केबल टिव्ही, सिमेनागृह, कारखाने, उद्योग व्यवसाय व मजूर संघटना अर्ज
करू शकतील.
व्यसनमुक्ती कार्य करणाऱ्या व्यक्तीस 15 हजार व संस्थेस
30 हजार रूपये रोख, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या गटातुन एकूण 51 पुरस्कारार्थींना
सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यातील
कार्यकर्ते आणि संस्थांचाही गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराबाबत अधिक माहिती जिल्हा
परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. पुरस्कारासाठी 22 ऑगस्टपर्यंत कार्यालयात
अर्ज सादर करावे, असे जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी जया राऊत यांनी
कळविले आहे.
000000000
Comments
Post a Comment