कारवाईची वेळ आणू नका, तक्रारी निकाली काढा
-पालकमंत्री संजय राठोड
*नेर येथे समाधान शिबिरातील तक्रारींचा आढावा
*पाच सप्टेंबरपर्यंत अंतिम उत्तर सादर करा
यवतमाळ, दि. 20 : सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दाखल तक्रारी, निवेदनांवर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक असताना अद्यापही काही विभागांनी अंतिम कार्यवाही केलेली नाही, ही गंभीर बाब आहे. तक्रारी प्रलंबित ठेऊन आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
नेर येथे क्रीडा विभागाच्या सभागृहात समाधान शिबिरातील प्रलंबित तक्रारीचा निपटारा करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, पंचायत समिती सभापती भरत मसराम, तहसिलदार श्री. गेडाम, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र राऊत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या तात्काळ सोडविता याव्या म्हणून विभागीय स्तरावर सदर समाधान शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरात हजारो नागरीकांनी आपल्या समस्या, अडचणी निवेदनाद्वारे दाखल केल्या होत्या. यातील अनेक तक्रारी निकाली निघाल्या असल्या तरी काही तक्रारींना अंतिम कार्यवाही होणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदर शिबिरे घेण्यात आली होती. त्यामुळ या शिबिरातील तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. ज्या तक्रारी अद्यापही प्रलंबित आहे, त्यावर दि. 5 सप्टेंबरपर्यंत अंतिम आणि लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
शासन-प्रशासन जनतेसाठी काम करते. सर्वसामान्य नागरीकांस केंद्रबिंदू मानून काम करताना नागरीकांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देणे आपले कर्तव्य आहे, ही भावना काम करताना प्रत्येकात असणे आवश्यक आहे. त्यामुळे जुन्या तक्रारींवर अंतिम कार्यवाही झाल्यानंतर नव्याने समाधन शिबिरे घेणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी तलाठी भवन, नेर येथील प्रशासकीय इमारतीच्या बाबतही त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
…त्यांना अनुदान योजनेचा लाभ द्या
            विविध कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या मदतीची आवश्यकता असलेल्यांसाठी शासनाच्या वतीने अनुदान योजना राबविण्यात येते. अशा लाभार्थ्यांना प्राधान्याने संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेचा लाभ दिला जावा. सिकलसेल किंवा अन्य दुर्धर आजाराने गंभीर रूग्ण तसेच अपंगांना या योजनेचे अनुदान तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती