शासनाचा शेतकरी हाच केंद्रबिंदू
- पालकमंत्री संजय राठोड
* जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजना
* शेतकऱ्यांनी परिस्थितीला धैर्याने समोर जावे
यवतमाळ, दि. 15 : शासनाच्या दृष्टीने शेतकरी हा महत्त्वाचा केंद्रबिदू आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी, यासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांची सि्थती नक्कीच सुधारली जाईल, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्र्यांनी ध्वजारोहन केल्यानंतर त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार नंदिनी पारवेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड यांनी सुरवातीला स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शुरविरांना वंदन केले. हे स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या बलिदान आणि त्यागाचे प्रतिक असल्याचे सांगून राज्यात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकासाची कामे केली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचे पर्व सुरू झाले असून सातत्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे. महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. सर्वच पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. कर्जाची परतफेड करू शकले नाहीत, अशांचे कर्ज पुनर्गठणाची करण्यात आले आहे. वीज जोडणीचा विशेष कार्यक्रम घेण्यात हाती घेण्यात आला आहे. त्यासोबतच सौरऊर्जा कृषि पंपाचे वाटप केले आहे.
विकासात्मक कार्य करीत असताना सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सावकारी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८७ शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रीय पिकविमा योजनेतून २ लाख १६ हजार शेतकऱ्यांना ११७ कोटीच्या विमा मिळाला आहे. जीवनदायी आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जात आहे. तसेच ८८ हजार शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्न सुरक्षेच्या लाभा देण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या सहकार्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल होत आहे. यामुळे सुपर स्पेशालीटी वैद्यकीय सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेच्या 7० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. सामान्य नागरीकांसह शेतकरी, शेतमजूरांना भक्कमपणे आधार देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे दुष्काळ, नापिकीसारख्या संकटाला शेतकऱ्यांनी र्धेर्याने पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, स्वच्छ महाराष्ट्रासाठी दि. 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान 18 लाख गृहभेटी देण्यात येणार आहे. अवयवदानाच्या कार्यात नागरीकांनी सहभागी होऊन अवयवदानाच्या प्रतिक्षेतील रूग्णांना जीवनदान देण्यासाठी हातभार लावावा, तसेच मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री ही योजना योजनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘माझी कन्या भाग्यश्री’च्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील खुशी शेख या मुलीची आई सलमा शेख रमजान शेख, समृद्धी या मुलीची आई वेदांती प्रविण राऊत, नेर तालुक्यातील मांगूळ येथील स्वरा या मुलीची आई सपना राजकुमार नंदागवळी, कळंब तालुक्यातील पहूर येथील पायल या मुलीची आई प्रणाली पंडीत खंडाळकर, यवतमाळ तालुक्यातील भारी येथील वैभवी या मुलीची आई सारीका मंगेश गुरनुले, दारव्हा तालुक्यातील वारज येथील बाली या मुलीची आई सुनिता निलेश अगलधरे, दारव्हा तालुक्यातील बोरी येथील नंदीनी या मुलीची आई अर्चना संदीप गायकवाड या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘कृषि समृद्धी’चे प्रकाशन
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘कृषि समृद्धी’चे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते बचत भवनात करण्यात आले.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती